‘कुरुमावतार’

इमेज
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...

जय भीम!


‘जय भीम’ हा टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेला तमिळ सिनेमा नुकताच ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला आहे. कथा पूर्णतः सत्य घटनांवर आधारलेली आहे. सिनेमाचा कालावधी साधारण १९९३ ते १९९५ या दरम्यानचा आहे. म्हणजेच जयललिता यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी. या काळात पोलिसांकडून आदिवासींवर अमानुष पद्धतीनं अत्याचार होत होते. सर्व प्रकारचे कायदेशीर अधिकार नाकारत अनेक आदिवासींना तुरुंगात डांबलं जात होतं. अशा व्यवस्थेविरोधात लढा देणारे उच्च न्यायालयाचे वकील चंद्रू हे या सिनेमाचे नायक आहेत. त्यांनी १९९३पासून हजारो आदिवासी, दलितांना कायदेशीर पद्धतीनं न्याय मिळवून देण्याचं काम अविरत केलं. तसंच तमिळनाडूमधील कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं.

या सिनेमाचा विषय चंद्रू यांच्या लढ्यातील एक महत्त्वाचा खटला आहे. इरुलर आदिवासी जमातीतील एक शोषित स्त्री (संगेनी), तिचा नवरा (राजकन्नू) आणि संबंधित कुटुंबीयांची ही कथा आहे. इरुलर आदिवासी जमात ही तमिळनाडूमधील एक उपेक्षित आणि शोषित जमात आहे. अनेक वर्षांपासून चोरी करणं हा त्या समुदायाचा गुणधर्म आहे, असं समजून आजच्या काळातदेखील त्यांना समाजातून नाहक त्रासातून जावं लागतं आहे.

महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पारधी समाज आहे, त्याच प्रकारची ही जमात. या जमातीतील लोक नाग पकडण्यात माहीर असतात. राजकन्नूदेखील असतो. त्यामुळे तो गावच्या प्रमुखांच्या घरी जाऊन साप पकडतो. तेव्हा घरात टेबलखाली काही दागदागिने पडलेले दिसतात. तो प्रामाणिक पद्धतीनं ते परत करतो. पण काही दिवसांनी गावप्रमुखांच्या घरात पुन्हा चोरी होते, तेव्हा पोलीस राजकन्नूला केवळ शंकेच्या आधारावर कस्टडीत घेतात आणि बेदम मारहाण करतात. तेव्हा राजकन्नू सहकाऱ्यांना सांगतो की, ‘आपण मार खाऊन जे शरीरावर व्रण घेतले आहेत, ते काही दिवसांत जातील, पण चोरीचा शिक्का मारून घ्यायचा नाही. मजबूत व्हा.’ चित्रपटातील हे दृश्य मनाला हेलावून टाकणारं आहे.

राजकन्नू पोलीस कस्टडीतून फरार झाल्याचं पोलीस सांगतात. पुढे राजकन्नूचा शोध घेण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी गरोदर संगेनी आणि तिची लेक दारोदार भटकतात. अशा परिस्थितीत आदिवासींना शिक्षण देण्याचं काम करणारी मैत्रेय ही समाजसेविका तिला चंद्रू यांच्याकडे घेऊन जाते… आणि न्यायालयाची ट्रायल सुरू होते. एकीकडे कोर्टरूम ड्रामा, तर दुसरीकडे समांतर चालणारे आदिवासी आणि त्यांच्यावरील अत्याचार अशा पद्धतीनं सिनेमा पुढे जात राहतो.

यातून अनेक विचार मांडले जातात. उदा. एका शाळेच्या कार्यक्रमात मुले गांधी-नेहरू यांच्या भूमिका करत असतात. त्या पाहताना चंद्रू सहज बोलतो की, गांधी-नेहरू आहेत, पण आंबेडकर कुठे दिसत नाहीत. तसंच काही दृश्यांत चंद्रूच्या घराच्या भिंतीवर मार्क्स, आंबेडकर आणि पेरियार यांची छायाचित्रं लावलेली दिसतात. त्यामुळे हे लक्षात येतं की, सिनेमावर असलेला या तीन महापुरुषांचा प्रभाव एकत्रितपणे पाहिल्याशिवाय तो समजणं कठीण आहे.

गांधी-नेहरू यांचा अभिनय करणारी मुलं, तसंच एका दृश्यात पोलीस स्टेशनमधील गांधींचं चित्र कोणत्या विचारानं दाखवलं आहे, हे समजणं अवघड आहे. त्यामुळे एकीकडे मार्क्स, आंबेडकर, पेरियार आणि दुसऱ्या बाजूला गांधी-नेहरू दाखवण्याचं प्रयोजन गडबडवून टाकतं. म्हणजे गांधी, नेहरू पुरेसे नाहीत की, गरजेचे नाहीत, हे समजायला मार्ग नाही.

‘जय भीम’ असं नाव असलं तरी सिनेमात हा नारा कुठेही दिला गेला नाही. त्याचा अर्थ आपल्याला सिनेमात शोधावा लागतो, मगच तो सापडतो. उदा. चंद्रू कम्युनिस्ट चळवळीत हिरीरीनं सहभाग घेतो आणि रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात लढताना मार्क्सवादी वाटतो. दुसऱ्या बाजूला संविधानाच्या मार्गानं शोषितांना संविधानिक मार्गानं न्याय मिळवून देणारे चंद्रू आंबेडकरी वाटतात. आणि त्यांच्या अंतरविश्वातील संवेदनशीलता पाहता ते ‘बुद्धिस्ट’ असल्याचं भासतं. बागकाम करत असताना त्यांच्या बागेत बुद्धाची मूर्ती दिसते. म्हणूनच कदा
चित कथाकार-दिग्दर्शकांनी अन्याय, शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी एकूण सर्व विचारांचं सिन्थेसिस म्हणून आंबेडकर मांडले आहेत, असं वाटतं. किंवा प्रत्येक लढाई वेगवेगळ्या पद्धतीनं लढताना आंबेडकरच (जय भीम) संयुक्तिक वाटले असावेत. म्हणूनच कम्युनिस्ट असूनही हिंसेचा मार्ग न अवलंबता त्यांनी संविधानिक मार्गानं लढा उभा केल्याचं लक्षात येतं. तरीही मार्क्स नाकारता येत नाही, ही बाजूदेखील ठामपणे मांडली आहे. त्यामुळे ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे, असं लक्षात येतं.

या सिनेमाचं चित्रण पाहता एकूणच पोलीस यंत्रणा ही ब्रिटिशकाळातील शोषणकारी व्यवस्था वाटल्यावाचून राहत नाही. क्रिमिनल ट्राईब अ‍ॅक्टनुसार ब्रिटिशांनी अनेक जातीजमातींवर ‘जन्मजात गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारला होता. त्याचे परिणाम स्वातंत्र्यानंतर २१व्या शतकापर्यंत दिसतात. १९५३ साली क्रिमिनल ट्राईब अ‍ॅक्टची जागा ‘हेबिच्युअल क्राईम अ‍ॅक्ट’ने घेतली आणि काहीशी परिस्थिती बदलली, पण पोलीस मानसिकता बदललेली अजूनही दिसत नाही, हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून दिसतो. जामीन, फेअर ट्रायल, या सर्व गोष्टींपासून अजूनही बऱ्याच जाती-जमाती, आदिवासी वंचित आहेत. किंवा या गोष्टी फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांसाठीच आहेत, अशी परिस्थिती आहे. सिनेमा १९९०-९५ काळातील असला तरी आजच्या परिस्थितीशी सुसंगत असल्यासारखा वाटतो. त्यामुळे सरकारी व्यवस्थेकडून पोलिसी यंत्रणेच्या माध्यमातून होणारं शोषण हे ‘जय भीम’च्या माध्यमातून समोर आलं आहे. या धाडसी कामाचं निश्चित स्वागत व्हायला हवं.

वकील चंद्रू यांची भूमिका सूर्या यांनी केली आहे. ती त्याच्या नेहमीच्या भूमिकांपासून वेगळी असली तरी ती अजून उजळून निघणारी आहे. शांत आणि संवेदनशील सूर्या प्रभावित करतो. लिजिमोल जोस (संगेनी) आणि मणिकंडन (राजकन्नू) यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. प्रकाश राज यांनी एका वरिष्ठ पोलिसाची भूमिका केली आहे. पण ती फार मर्यादित दिसते. त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव जाणवत नाही. पटकथा संथ आहे, पण दृश्यं प्रभावी आहेत. दिग्दर्शनाचा दर्जा तितका चांगला वाटत नाही, पण आशयामुळे सिनेमा प्रभावी वाटू शकतो. कथेचा आशय, भूमिका जबरदस्त असली तरी सिनेमा तितका उठावदार असल्याचं जाणवत नाही. पण हा सिनेमा त्याच्या विषयासाठी पाहणं गरजेचं ठरतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘कुरुमावतार’

नोमॅडलँड

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…