‘कुरुमावतार’
‘कुरुमावतार’ हा कन्नड चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला. तो विरभद्रप्पा यांच्या लघुथेवर आधारित आहे. कन्नड असल्याने किंवा कमर्शियल नसल्याने त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण हा चित्रपट कन्नडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केला आहे. ते समांतर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी एक आहेत, सत्यजित रे यांच्या पठडीतील. त्यांना चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘घटश्रद्धा’ (१९७७) या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवरील चित्रपटास सुवर्णकमळ मिळाले. पुढे ‘तबरना कथा’ (१९८६), ‘थाई साहिबा’ (१९९७) आणि ‘द्विपा’ (२००२) या चित्रपटांनादेखील सुवर्णकमळ मिळाले. या चित्रपटावर आता लिहिण्याचे कारण काय? तर आज जे काही ‘नथुरामायण’ महाराष्ट्रात सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा वाटतो. चित्रपटाची कथा अशी आहे- आनंद राव (एस. कृष्णमूर्ती) हे एक सरकारी नोकरदार अगदी हुबेहूब महात्मा गांधींसारखे दिसत असतात. ते टीव्ही सीरिअल बनवणाऱ्या दिग्दर्शकाला कुणीतरी सांगते. राव यांच्या ऑफिसमध्ये सिरिअल बनवणारे जातात. गांधीजींवर सिरिअल बनवण्याचे प्रयोजन आहे आणि तुम्...